बाहेरचे खाणे

बाहेरचे खाणे
हल्ली बाहेर खाण ही एक अतिशय कॉमन गोष्ट झालीय, म्हणजे अगदी शाळेत जाणारी मुलं देखील आईकडून पैसे घेऊन बरेचदा घरून डबा वगैरे न नेता बाहेर गाडीवर, कॅन्टीन मध्ये खातात. मग मोठी मुलं, होस्टेलवर राहणारी मुलं किंवा नोकरी करणारे एकटे राहणारे यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको.

बाहेर खाण्याची कारणं अनेक प्रकारची आहेत. कधी बदल म्हणून, कधी चैन म्हणून, कधी घरी स्वैपाक करायचा कंटाळा आला म्हणून, कधी कोणत्या गोष्टीचं celebration म्हणून आणि कधी कधी नाईलाज म्हणून बाहेर खाल्लं जातं.
पूर्वी बाहेर जायची वेळ आली किंवा प्रवासाला जायचं असलं तर तहानलाडू, भूकलाडू असं सोबत करून घ्यायची पद्धत होती. बाहेर काही मिळत नसे. आता मात्र खाण्याचे पदार्थच काय तर प्यायचे पाणीही पैसे टाकले की कुठेही मिळत.अगदी ५ /१० रुपयांपासून हे पदार्थ कुठेही सहज उपलब्ध असल्याने ते अगदी जातायेता घेऊन खाल्ले जातात.

जे पदार्थ म्हणजे वेफर्स, चिवडा, चॉकलेट्स इ. बंद पाकिटात मिळतात त्यांची थोडी तरी खात्री देता येते, म्हणजे त्यांची quality, दर्जा यांची, पण जे पदार्थ ताजे बनवून विकले जातात त्यांचं मात्र कल्याण आहे अगदी. काल परवाच अहमदाबादला पाणीपुरी मध्ये toilet cleaner वापरल्याची बातमी वाचून आपण हादरलोच की !

बहुतेक वेळा बाहेर खायचं म्हंटल की पहिली पसंती चविष्ट, चमचमीत पदार्थांना असते. काहीतरी चटपटीत हवं असतं, मग अशा पदार्थांमध्ये वडापाव,समोसा,कचोरी, भेळ,पाणीपुरी, कच्छी दाबेली, मिसळ या आणि या शिवाय अनेक chinese पदार्थांचा समावेश होतो, म्हणजे noodles, मन्चुरिअन वगैरे. शिवाय बेकरीचे अनेक पदार्थ केक, पेस्ट्री, पिझ्झा, बर्गर हे ही असतात. खरी अडचण ही आहे की प्रत्येक व्यक्तीची खर्च करण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि सहाजिकच त्यामुळे मिळणाऱ्या पदार्थाचा दर्जाही !!

तुम्ही रस्त्याच्या कडेला धूळ उडत असतानाही हे पदार्थ खाऊ शकता किंवा अगदी उत्तम, चकचकीत हॉटेल मध्ये A /C मध्येही बसून त्यांचा आस्वाद घेऊ शकता.

सर्वसामान्य जनता ही थोड्या पैशात हा आनंद विकत घेऊ बघते आणि फसते. अत्यंत हीन दर्जाचे बेसिक material वापरून केलेले हे पदार्थ आरोग्यासाठी घातक असतील यात काय शंका ?अनेक प्रकारची पिठ,तळायला तेल, त्यात वापरल्या जाणाऱ्या भाज्या, बटर,मसाले, कशा कशाचीही क्वालिटी बघायची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नसल्यामुळे आपण नक्की काय खातोय हे कळायला मार्गच नसतो. मग पाणी कोणतं वापरतायत वगैरे तर दूरची गोष्ट !!

अतिशय व्यावसायिक विचार करून आणि फक्त जास्तीत जास्त फायदा मिळवण्याच्या हेतूने अनेक घातक पदार्थ मिसळणं, स्वच्छतेची अजिबात दखलही न घेणे, जी माणसं ते पदार्थ तयार करतात त्यांचं स्वास्थ्य कसं आहे, त्यांना काही आजार वगैरे नाहीत ना या कशाचाही विचार केला जात नाही हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फारच भयावह आहे.

सहज जातायेता मुलांनी हट्ट केला म्हणून आपण काहीही खाऊ घालतो आणि मग पोट बिघडणं, उलट्या जुलाब होणं, acidity, इतकंच नाही तर पाण्यातून पसरणारे टायफॉईड सारखे आजार देखील होऊ शकतात.

क्वचित बदल म्हणून खाणाऱ्यांना कदाचित हे दुष्परिणाम जाणवणार नाहीत पण जे नाईलाजाने रोज असं बाहेरचं अन्न खातायत त्यांना मात्र हे खूप त्रासदायक ठरू शकतं, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यातल्या त्यात चांगलं जे मिळेल, जरा कमी चवीचं पण घरगुती, आरोग्यपूर्ण असेल ते खायचा प्रयत्न करावा. घरी करून खाण शक्य असेल तर उत्तमच.

मुलांना याचे वाईट परिणाम समजावून सांगून ती कमीतकमी बाहेर खातील याचा प्रयत्न करायला हवा आणि आयांनी घरच्याघरी छान, चविष्ट पदार्थ करून खाऊ घालण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे नाही का ?

वैद्य राजश्री कुलकर्णी
M. D. (आयुर्वेद)
www.ayushree.com

Leave a Reply

Your email address will not be published.